लंडन : विजय मल्ल्याविरोधातील प्रत्यर्पण केसवर सोमवारी यूकेच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात प्री-ट्रायल सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, भारतात आपल्या जिवाला धोका असल्याचं विजय मल्ल्याने आपल्या वकीलाद्वारे सांगितलं.


मल्ल्याच्या वकीलाच्या युक्तीवादानंतर भारताकडून त्याच्या सुरक्षेसंदर्भात रुपरेखा तयार करण्याचं काम सुरु आहे.

मल्ल्याच्या प्रत्यर्पण केसप्रकरणात तो सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याला प्रत्यर्पण केसची सुनावणी सुरु होईपर्यंत, प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे. या प्रकरणी 4 डिसेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे.

विजय मल्ल्याने भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून भारतातून पलायन करुन ब्रिटनमध्ये वास्तव्य केलं. पण आपण काहीही चुकीचं केलेलं नसल्याचा मल्ल्याने सातत्याने दावा केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकार पळपुट्या विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस अर्थात विश्रामगृह देण्याच्या तयारीत आहे. अर्थात हे मल्ल्याच्या सोईसाठी नाही, तर केंद्र सरकारला मदत आणि ब्रिटीश कोर्टाला दाखवण्यासाठी आहे.

त्यासाठी सरकारी विश्रामगृह जेलमध्ये बदलण्यास तयार आहोत, असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगितलं आहे.

भारतातील जेल खराब, अस्वच्छ आहेत, असा युक्तीवाद मल्ल्याच्या वकिलांनी ब्रिटीश कोर्टात केला. त्याला खोडून काढण्यासाठी आणि मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकरवी ही खेळी आहे.

दुसरीकडे सरकारने विजय मल्ल्याला ठेवण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलची चाचपणी केली आहे. या जेलमधील 12 नंबरच्या बराकमध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. इथेच मल्ल्याला ठेवण्याचं नियोजन आहे.

या बराकमध्ये एसी सोडून सर्व व्यवस्था युरोपीय जेलप्रमाणेच आहेत.

संबंधित बातम्या

विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस देण्यास राज्य सरकारची तयारी!

आर्थर रोडमध्ये जिथे कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार


कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक आणि लगेच जामीन


विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींकडून ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट