नवी दिल्ली : दुबईतून भारतात येण्यासाठी एका भारतीयाला सलग दोन वर्षे तब्बल एक हजार किमीची पायपीट करावी लागली. दुबईतील कामगार न्यायालयाच्या एका सुनावणीच्या तारखांना हजेरी लावण्यासाठी दोन वर्षे त्यांना पायी जावं लागलं. अखेर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्या मदतीसाठी धावून गेल्या.


जगन्नाथन सलवार यांना दुबईतील कामगार न्यायालयात सुनावणीसाठी जवळपास 20 पेक्षा अधिक वेळा जावं लागलं. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून कोर्टाचं अंतर 50 किमी होतं. मात्र ये जा करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना कोर्टात पायी ये जा करावी लागली.

जगन्नाथन यांनी 'खलीज टाईम्स' या वृत्तपत्राला ही माहिती दिली. पहाटे 4 वाजता उठून आपण कोर्टात जात होतो. मात्र प्रवास करण्यासाठी पैसे नसल्याने तब्बल दोन वर्षे आपल्याला पायपीट करावी लागली, असं जगन्नाथन यांनी सांगितलं.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/805976694762795008

जगन्नाथन यांचं प्रकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना माहित झाल्यानतंर त्यांनी तातडीने दुबईतील भारतीय दुतावासाला जगन्नाथन यांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जगन्नाथन हे सध्या भारतात आले आहेत. ते तामिळनाडुमधील तिरुचारापल्ली येथील रहिवासी आहेत.