कोलंबो : श्रीलंकेत रविवारी (21 एप्रिल) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या साखळी स्फोटांनी संपूर्ण देश हादरला आहे. त्यामुळे आज (सोमवार, 22 एप्रिल) मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी लागू केली जाणार आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी याबाबत घोषणा केली आहे.


काल इस्टरच्या दिवशी श्रीलंकेत आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये 6 भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक लोक जखमी झाले. श्रीलंकन पोलिसांनी या बॉम्बस्फोटप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अटक केलेल्या लोकांशी संबधित कोणतीही सार्वजनिक केलेली नाही.

श्रीलंकेत रविवारी स्थानिक वेळेनुसार, सकाळी पाऊणे नऊ वाजता आठ साखळी स्फोट झाले. पहिला स्फोट कोलंबोच्या सेंट अँथनी चर्चमध्ये झाला, दुसरा स्फोट नेगोम्बोच्या सेंट सबॅस्टियन चर्च आणि तिसरा बट्टिकलोवामधील चर्चमध्ये झाला, तसंच तीन पंचतारांकित हॉटलेलाही निशाणा बनवण्यात आलं. यामध्ये शंग्रीला, द सिनामोन ग्रॅण्ड आणि द किंग्जबरी या हॉटेलच समावेश आहे. तर सातवा स्फोट कोलंबोच्या देहीवाला हॉटेलसमोर झाला आणि आठवा स्फोट कोलंबोमध्येच झाला.

कालपासून श्रीलंकेत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भारताकडून मदत म्हणून एअर इंडियाने 24 एप्रिलपर्यंत कोलंबोहून येणारी-जाणारी तिकीटं रद्द किंवा रिशेड्यूल केल्यास त्यावर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवी दिल्लीहून कोलंबोसाठी दररोज दोन विमानांचे उड्डाण होईल तर चेन्नईहून कोलंबोला जाण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे दररोज एक उड्डाण होईल.