India at UN on Pakistan: संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्या देशाने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पाहुणचार केला आणि शेजारील देशाच्या संसदेवर हल्ला केला होता, अशा देशाला उपदेश करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jayshankar) यांनी पाकिस्तानला भर बैठकीत सुनावलं आहे. 


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) चर्चेदरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, 'जग ज्याला अस्वीकार्य मानते, त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही.  सीमेपलीकडील दहशतवादाच्या समर्थकांना हे नक्कीच लागू होते. ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करणे आणि शेजारच्या संसदेवर हल्ला करणे या गोष्टी या परिषदेसमोर पुरावा म्हणून काम करू शकतात, असंही जयशंकर यांनी म्हटलं. 






जयशंकर यांनी यावेळी म्हटलं की, दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी आणि कट रचणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा गैरवापर केला जात आहे.  जग एकजूट आहे. दहशतवादाचे आव्हान आहेच परंतु कटकारस्थानांना न्याय देण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा गैरवापर केला जात आहे, जो चुकीचा आहे. यामध्ये सुधारणा ही काळाची गरज आहे, असं म्हणत जयशंकर यांनी पाकला फटकारलं.


जयशंकर यांच्या भाषणातील आणखी काही महत्वाचे मुद्दे   


अशा महत्वाच्या मंचावर सुधारणांवर वादविवाद होतात मात्र दरम्यानच्या काळात खासकरुन कोरोना काळात वास्तविक जग नाटकीयरित्या बदलले आहे. आम्ही त्याकडे आर्थिक समृद्धी, तांत्रिक क्षमता, राजकीय प्रभाव आणि विकासात्मक प्रगतीच्या दृष्टीने पाहतो. 


कोविड महामारीच्या काळात, ग्लोबल साउथमधील अनेक असुरक्षित देशांना त्यांच्या पारंपारिक स्त्रोतांच्या पलीकडे जाऊन त्यांची पहिली लस मिळाली. 


हवामान बदलाचा विषय येतो तेव्हा लक्षात येतं की अद्याप परिस्थिती सुधारलेली नाही. अशा योग्य मंचावर संबंधित मुद्द्यांवर लक्ष देण्याऐवजी लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.  


ही बातमी देखील वाचा


S Jaishankar : 'भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था' : एस जयशंकर