Sri Lanka News: श्रीलंकेत हिंसक निदर्शनांदरम्यान कर्फ्यू लागू करण्यात आला असून हिंसाचार करणाऱ्यांना बघताच गोळ्या घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी देशाला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी लवकरच नवे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले आहे. येत्या एक आठवड्याच्या आत नवीन पंतप्रधानाची नियुक्ती करून मंत्रिमंडळाची निवड केली जाईल, असे ते म्हणाले.


राष्ट्रपती गोताबया म्हणाले की, ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याचे सरकार स्थापन होईल. यासोबतच यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचीही निवड केली जाणार आहे. देशातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रपतींनी लोकांना हिंसाचार करू नका आणि आंदोलने थांबवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सदनाला अधिक अधिकार देण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती सादर केली जाईल.


हिंसाचाराची चौकशी केली जाईल


गोताबया म्हणाले की, देशात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थैर्य येईल. त्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलली जातील. यावेळी नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता वाचवण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हिंसाचारावर बोलताना गोताबया म्हणाले की, गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या हिंसाचाराचा मी निषेध करतो. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचार, हत्या, जाळपोळ, तोडफोड आणि असे कोणतेही कृत्य समर्थनीय ठरू शकत नाही.


दरम्यान, श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या विरोधात देशभरात तीव्र निदर्शने सुरू आहेत. त्यांच्या समर्थकांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. राजीनामा दिल्यानंतर, महिंदा राजपक्षे यांना त्रिंकोमाली येथील नौदल तळावर नेण्यात आले, जिथे त्यांना चोख बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तसेच देशात कायदा-सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी, सुरक्षा दल वाहनांमध्ये गस्त घालत आहेत. कोणतीही हिंसक निदर्शने रोखण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैनिकांना सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा इतरांचे नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.