नीरव मोदी प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची बदली नाही, ईडीकडून स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2019 08:48 PM (IST)
नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी सत्यव्रत कुमार यांची बदली केली नसल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली असल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच काही बातम्यांमध्ये कुमार यांना ईडीच्या सहसंचालक पदावरुनही हटवण्यात आले असल्याचे म्हटले होते. परंतु कुमार यांची बदली केली नाही तसेच त्यांना सहसंचालक पदावरुन हटवले नसल्याचे स्पष्टीकरण ईडीने (सक्तवसुली संचलनालय) दिले आहे. सक्तवसुली संचलनालयाने म्हटले आहे की, "कुमार यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे, परंतु त्यांची बदली करण्यात आलेली नाही. तसेच ते कोळसा घोटाळा प्रकरणाचा तपास सुरु ठेवतील. अन्य तपास अतिरिक्त संचालक करतील." सत्यव्रत कुमार हे या प्रकरणाचा अगदी सुरुवातीपासून तपास करत होते. ते सध्या लंडनमध्येच आहेत. त्यांची बदली केली तर नीरव मोदी प्रकरणावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणी सध्या सुनावणी सुरु आहे. पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदी याला 19 मार्च रोजी लंडन येथे अटक करण्यात आले. अटकेनंतर त्याला इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात सादर करण्यात आले असून या कोर्टात त्याच्यावर सध्या खटला सुरु आहे. नीरव मोदी जानेवारी 2018 पासून भारतातून फरार झाला आहे. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआय तपास करत आहेत. वाचा : पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला अखेर बेड्या, नऊ दिवसांची कोठडी EXCLUSIVE | कर्जबुडवा नीरव मोदी एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद | लंडन | एबीपी माझा