लाहोर: "विनायक दामोदर सावरकर यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती", असं वादग्रस्त विधान काँग्रेसमधून निलंबित केलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात केलं.


लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केलं.

इतकंच नाही तर अय्यर यांनी भारतात सुरु असलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या वादानंतरही, पाकिस्तानात जाऊन जिना यांचं कौतुक केलं.

सावरकरांकडून हिंदुत्वाचा शोध

सावरकरांनीच हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. द्विराष्ट्र सिद्धांतही त्यांनीच मांडला आणि त्यांचेच समर्थक सध्या भारतात सत्तेत आहेत, असं सांगत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

“भारताची सद्यस्थिती भिबत्स आहे. 1923 मध्ये सावरकर नावाच्या व्यक्तीने हिंदुत्व शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. हा शब्द कोणत्याही धर्मात लिहिलेलं नाही”, असं मणिशंकर अय्यर म्हणाले.

निवडणुकीपूर्वी वादग्रस्त वक्तव्य

मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणुकीपूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक निवडणुका तोंडावर असताना, त्यांनी पुन्हा असं वक्तव्य केलं.

लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत 70 टक्के जनतेने मोदींना नाकारलं आहे. आता आशा आहे की तेच 70 टक्के लोक पुन्हा एकत्र येऊन मोदी सरकारचा अंत करेल, असं अय्यर यांनी नमूद केलं.

जिन्नांचं कौतुक

यावेळी अय्यर यांनी जिना यांचं कौतुक केलंच, शिवाय त्यांची तुलना महात्मा गांधींशी केली.

अय्यर यांनी जिनांचं कौतुक करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

अय्यर म्हणाले, “मी जिना यांना ‘कायदे आझम’ म्हटलं तर, अनेक भारतीय अँकर्सनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कोणीही भारतीय पाकिस्तानात जाऊन असं कसं काय म्हणू शकतो? असं मला विचारण्यात आलं. मात्र मी म्हणालो, मी अनेक पाकिस्तानी नागरिकांना ओळखतो, जे एम के गांधी यांना महात्मा गांधी म्हणतात. मग यामुळे सर्व पाकिस्तानी देशद्रोही ठरतील का?

भाजपचा पलटवार

अय्यर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे.

“काँग्रेसच्या संस्कारी फ्रीलान्सरची ही खरी भावना आहे. अशाप्रकारची वक्तव्य मणिशंकर अय्यरांना नवी नाहीत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द जिथून सुरुवात केली, तिथले संस्कार त्यांनी आत्मसात केले”, असा हल्लाबोल भाजप नेते मुख्तार अब्बास नख्वी यांनी केला.

जिना वाद

उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालय अर्थात एएमयूमधील मोहम्मद अली जिना यांच्या फोटोवरुन वाद सुरु आहे.  भारताच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरलेल्या पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा फोटो एएमयूमध्ये का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यापीठातील छात्रसंघाच्या कार्यालयातील जिनांच्या फोटोवरुन मोठा वाद सुरु आहे.

मोहम्मद अली जिना हे 1938 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठात आले होते. त्यावेळी छात्रसंघाने त्यांना विद्यापीठाचे आजीवन सदस्यपद दिलं होतं. तेव्हापासून जिना यांचा फोटो विद्यापीठात लावण्यात आला आहे.

मात्र हा फोटो काढण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांनी केली आहे. मात्र विद्यापीठातील छात्रसंघ हा फोटो हटवण्यास तयार नाही.

भारताच्या फाळणीसाठी जिना हेच जबाबदार होते, त्यामुळे त्यांच्या फोटो काढावा अशी मागणी होत आहे.