लंडन : भारतीय बँकांना चुना लावून पळून गेलेला कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याचा जामीन कालावधी लंडनमधील कोर्टाने 12 सप्टेंबरपर्यंत वाढवला. भारत करत असलेल्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांना विजय मल्ल्याने न्यायालयात आव्हान दिलं आहे. मल्ल्याच्या जामीनात वाढ करण्यात आल्याने त्याला भारतात आणण्यासाठी आता अजून वेळ लागेल.


विजय मल्ल्यावर विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याच्या आरोप आहे. या आरोपात अटक झाल्यानंतर मल्ल्या एप्रिल 2017 पासून जामीनावर बाहेर आहे. मल्ल्यावरील सुनावणीदरम्यान सीबीआय आणि ईडीची टीमदेखील लंडनमध्ये हजर होती.

सुनावणीवेळी मल्ल्या मुलगा सिद्धार्थसोबत न्यायालयात पोहोचला. ‘शेवटी न्यायालयच निर्णय देईल,’ असं सुनावणीआधी मल्ल्याने म्हटलं.

दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेले पुरावे स्वीकारले जातील, असं एप्रिलमध्ये झालेल्या मागील सुनावणीवेळी कोर्टाने म्हटलं. त्यामुळे सीबीआयच्या प्रयत्नांना बळ मिळालं होतं.

ब्रिटनमधील न्यायालयात सीबीआयने मोठ्या प्रमाणात पुरावे सादर केले आहेत. ज्यामध्ये आयडीबीआय बँकेचे माजी उपमहाव्यवस्थापक बी के बात्रा यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे.

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मागच्या वर्षी डिसेंबरपासून लंडनच्या न्यायालयात केस सुरु झाली. मल्ल्या मार्च 2016 साली भारतातून लंडनला पळून गेला आहे.