हरारे, झिम्बाब्वे :  झिम्बाब्वेमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात (Zimbabwe Plane Crash) भारतीय उद्योजक, त्यांचा मुलगा ठार झाला आहे. या अपघातात एकूण सहाजणांना प्राण गमवावे लागले आहे. नैर्ऋत्य झिम्बाब्वेमधील एका हिऱ्याच्या खाणीजवळ हे खासगी विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात भारतीय उद्योजक हरपाल रंधावा (Harpal Randhawa), त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंह रंधावा आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे. 


वृत्तसंकेतस्थळ 'आयहरारे'ने दिलेल्या वृत्तानुसार, मशावा येथील जवामहांडे भागात झालेल्या विमान अपघातात खाण कंपनी 'रियोजिम'चे मालक हरपाल रंधावा, त्यांचा मुलगा आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे. रियोजिम कंपनी ही सोने आणि कोळशा खाणीचे उत्खनन करते. त्याशिवाय निकेल आणि तांबे शुद्धीकरण करणारी प्रमुख खाण कंपनी आहे. 


वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, रियोजिमच्या मालकीच्या सेसना 206 हे विमान शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी हरारे ते मुरोवा हिरा खाणीच्या दिशेने जात होते. या खाणीची मालकी रियोजिम कंपनीकडे आहे.  त्यावेळी हा अपघात घडला. सिंगल इंजिन असलेले विमान मुरोवा डायमंड खाणीजवळ अपघातग्रस्त झाले. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हवेतच स्फोट झाला.  या अपघातात विमानाचे पायलट क्रू आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. 






'द हेराल्ड' वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, , अपघातात ठार झालेले चार जण परदेशी नागरीक होते, तर इतर दोघे झिम्बाब्वेचे नागरिक होते. पोलिसांनी अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत, परंतु रंधवा यांचे मित्र, पत्रकार आणि चित्रपट निर्माते होपवेल चिनोनो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) द्वारे शोकसंदेश देखील पोस्ट केला. या अपघातामुळे झिम्बाब्वेमधील उद्योगजगतावर, भारतीय समुदायावर शोककळा पसरली आहे. 


इतर महत्त्वाची बातमी :