नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सुरक्षित आहेत, अशी कबुली पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी भारत-पाकिस्तानसंबंधीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.


सुरक्षेसंबंधीत मुद्द्यांवर राजनैतिक मदत केवळ ‘मेरिट’च्या आधारावरच दिली जाईल, असं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जो सामंजस्य करार आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे, असं उत्तर बासित यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेल्या सुनावणीवर विचारलेल्या प्रश्नाला दिलं.

‘’पाकिस्तानी चौक्या उडवल्याचा व्हिडिओ खोटा’’

भारतीय लष्कराने 9 मे रोजी नौसेरामध्ये केलेल्या कारवाईचा व्हिडिओ खोटा असल्याचा दावाही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी केला. पाकिस्तानच्या चौक्या उध्वस्त करण्यात आलेल्या नाहीत, असा दावा बासित यांनी केला.

‘’भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना नाही’’

पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम म्हणजे BAT ने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली नाही, असा दावा बासित यांनी केला. भारताकडे यासंबंधित काही पुरावा असेल, तर तो पाकिस्तानला द्यावा, असं आव्हानही बासित यांनी दिलं.

काश्मीरप्रश्नी पुन्हा कांगावा

काश्मीर ही एक समस्या असून ती सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. काश्मीरप्रश्न सुटला नाही तर उभय देशांचे संबंधही सुधारणार नाहीत. पाकिस्तान काश्मीरींना भारताविरुद्ध भडकावत नाही, असा दावाही बासित यांनी केला. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुरहान वानीला हिरो म्हणून काहीही चूक केलेली नाही, असंही बासित म्हणाले.

हाफिज सईदचा बचाव

कुख्यात दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचाही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी बचाव केला. भारताने केवळ करायचे म्हणून आरोप करु नये, तर हाफिज आणि मसूद अजहर यांच्याविरोधात काही ठोस पुरावे द्यावेत, असं आव्हान बासित यांनी दिलं.

मोदींच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय धोरणाने पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरुन जगभरात एकटं पाडलं आहे का, असा सवाल एबीपी न्यूजने बासित यांना केला. मात्र असं काहीही नाही म्हणत अमेरिका, चीन आणि रशियासोबत असलेल्या संबंधांविषयीचे दाखले बासित यांनी दिले.