बीजिंग : चीनी सरकारच्या आखत्यारित असलेल्या माध्यमांनी एक अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. त्यांनी तयार केलेल्या भारताच्या नकाशात काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश केला आहे. यामुळे भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. परंतु धूर्त चीनने असे पाऊल उचलण्यामागचे काय कारण असू शकते? यावर विचार केला जाऊ लागला आहे. परंतु चीनी माध्यमांच्या या नकाशामुळे चीनचा जवळचा मित्र असलेल्या पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला आहे.


दरम्यान, असा नकाशा प्रकाशित करुन त्यावर पाकिस्तानकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहण्यासाठी चीनने असे केले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच 10 डिसेंबर रोजी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये युद्ध सराव होणार आहे. त्यामुळे चीनने असे केले असावे, असेही म्हटले जात आहे.
या सर्व प्रकारामध्ये एक लक्ष वेधून घेणारी बाब अशी आहे की, 'बेल्ट अॅन्ड रोड' ही चीनची सर्वात महत्तवकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे भारत-चीनमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. या योजनेमध्ये चीनला पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक रस्ता बांधायचा आहे. या रस्त्यावर भारताचा अक्षेप आहे. अशा परिस्थितीत चीनने प्रकाशित केलेला नकाशा अधिक विचार करायला लावणारा आहे.

दुसऱ्या बाजूला पाक हा चीनचा मित्र देश आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील कराची शहरात चीनच्या काऊन्सलेटवर हल्ला झाला. पाकिस्तानी सरकार चीनी लोकांची सुरक्षा करु शकले नाही. त्यामुळे चीन सध्या पाकिस्तानवर नाराज आहे. त्यामुळे दुखावलेल्या चीनने पाकव्याप्त काश्मीरचा भारताच्या नकाशात समावेश केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.