बिजिंग : डोकलाम मुद्यावरून भारत-चीनच्या सैन्यामधील तणावात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सिमा भागात शांतता हवी असले, तर डोकलाममधून तातडीनं सैन्य हटवा असा इशारा चीननं पुन्हा एकदा भारताला दिला आहे.


याबाबत चीनने १५ पानांचे निवेदन जारी केलं असून, यामध्ये भारताने कुठल्याही अटींशिवाय डोकलामधील आपलं सैन्य हटवावं, अशी मागणी केली आहे. डोकलाम प्रकरणी भारत विनाकारण भूतानला एका प्याद्याप्रमाणे पुढे करीत असल्याचा आरोपही चीननं केलाय.

डोकलाम हा भूतान आणि चीन या दोन्ही देशांतील वाद आहे. हा वाद दोन्ही दोशांमध्ये रहायला हवा. डोकलामप्रकरणी कुठल्याही कारवाईचा भारताला अधिकार नाही. भारत या प्रकरणी विनाकारण वाद निर्माण करीत आहे, असा दावाही चीननं केला आहे.

गेल्या महिन्यात अजित डोभाल ब्रिक्स देशांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिजिंग दौऱ्यावर होते. या बैठकीदरम्यान 28 जुलै रोजी डोभाल यांची चीनचे स्टेट काऊंसिलर यांग जेइची यांच्याशी भेट झाली. या भेटीत ब्रिक्स सहकार्य, द्विपक्षीय संबंध आणि इतर प्रमुख समस्यांवर चर्चा झाली. या भेटीचा वृत्तांत चिनी परराष्ट्र मंत्रालयानं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीदेखील 'युद्धासाठी तयार राहा,'असे आदेश चिनी सैन्याला दिले होते. तत्पूर्वी डोकलाम सीमावादवरून चीनने भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला होता. एकवेळ डोंगर पर्वतांना पाडणे सोपे आहे. मात्र चीनच्या लष्कराला धक्का लावणं सोपं नाही, अशी दर्पोक्ती चिनी लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली होती.

आता चिनी स्टेट काऊंसिलरनेही डोकलाम मुद्द्यावरुन ब्रिक्स देशांच्या बैठकीत भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश

आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती