Wardha Agriculture News : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmers)  चिंतेत सापडला आहे. कारण मातीमोल दरानं टोमॅटोची विक्री (Tomato Price) होत आहे. एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.    


दर घसरल्यानं टोमॅटो गुरांपुढे टाकण्याची वेळ 


टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी-मुंगापूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटो चक्क गुरांपुढे टाकले आहेत. टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. सततच ढगाळ वातावरण आणि बाजारात टोमॅटोची वाढलेली आवक यामुळं एकेकाळी चारशे ते पाचशे रुपयांना जाणारं टोमॅटोचं कॅरेट आता 50 रुपयांना विकलं जात आहे. 


लागवड ते तोडणीपर्यंतचा खर्च मोठा


वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील खापरी येथील शेतकरी पुरुषोत्तम गणपत वैद्य यांना पाच एकर शेती आहे. या शेतीपैकी एक एकरमध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर उतरल्यामुळं पुरुषोत्तम वैद्य यांनी आपल्या शेतातील टोमॅटो जनावरांना खाऊ घातली. पुरुषोत्तम वैद्य यांचा टोमॅटो लागवड ते तोडणीपर्यंत मोठा खर्च झाला आहे. सध्या टोमॅटो विक्रीतून तो खर्च निघणेही कठीण झालं आहे. टमॅटोच्या विक्रीतून मजुरीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.


टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत


दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना टोमॅटो फेकूण देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या दरानं शेतखऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. विदर्भात टोमॅटो सारख्या भाजीवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. जे आहेत ते बोटावर मोजण्याइतके आहेत. समृद्धी महामार्ग झाला आहे. या मार्गाच्या माध्यमातून टोमॅटो मेट्रो शहरपर्यंत पोहोचू शकतात. पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर दुसरीकडे कोल्ड स्टोरेजची निर्मिती देखील झाली पाहिजे. टोमॅटो सारख्या उत्पादनाला कोल्ड स्टोरेजची नितांत गरज आहे, कारण दर आल्यावर त्याची विक्री करता येईल अशी व्यवस्था हवी आहे. दरम्यान, आधीच अतिवृष्टीमुळं शेतखऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आता शेतमालाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : कवडीमोल भावामुळे टोमॅटो तोडणी बंद; शेतशिवार लालेलाल, लातूरच्या वडवळ गावातील शेतकरी आर्थिक संकटात