वर्धा : बुलढाणा (Buldhana)  येथे समृद्धी महामार्गावर(Samruddhi Mahamarg) विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला या घटनेला पाच महिने लोटली आहे. मृतांमध्ये वर्ध्यातील प्रवशांची सर्वाधिक संख्या होती. अपघातानंतर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. पण अजूनही अपेक्षित मदत मिळाली नाही, याशिवाय या अपघाताची एस आय टी (SIT)  चौकशीही झाली नाही. मदतीच्या अपेक्षेत असणाऱ्या मृतकांच्या कुटुंबीयांनी  वर्ध्यात आता साखळी उपोषण सुरू केलय. आगीत होरपळलेल्या मृतकांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


  1 जुलै 2023  बुलढाणा शहरानजीकच्या समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात झाला. पुण्या- मुंबईकडे करिअर करण्यासाठी निघालेले वर्ध्यातील तरुण आणि तरुणी झोपेतच होरपळले गेले. तब्बल 25 प्रवाशांना आगीच्या ज्वालांनी कवेत घेतले. कुणाची आई, कुणाची बहीण तर कुणाचा मुलगा हिरावला गेला. घटनेला पाच महिने पूर्ण झालेय. केवळ पाच लाख रुपये मदत देऊन तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप होतोय. घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. पण अद्याप मदत पोहचलीच नाही.


वर्ध्याच्या गांधी चौकात बेमुदत उपोषण सुरू


कुटुंबातील जीव गेले... ऐन तरुणाईत कुणाचा मुलगा गेलाय... तर कुणी आपली आई अपघाताने हिरावल्याने अनाथ झालाय. आता घर सावरणार कोण? वृद्धत्वाचा आधार ठरणार कोण? असा प्रश्न चेहऱ्यावर असणाऱ्या आई-वडिलांनी वर्ध्याच्या गांधी चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 


 मृतांच्या या नातेवाईकांची मागणी तरी काय? 



  •  मृतकांच्या कुटुंबियांना घोषित करण्यात आलेली 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्या

  •  अपघाताची एस आय टी चौकशी करा

  •  समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सला बंदी घाला

  •  ट्रॅव्हल्स मालकावर कठोर कारवाई करा


आपल्या मागण्यासाठी कुटुंबीयांनी आतापर्यंत काय केले?


1) उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले


2) जिल्हा प्रशासनाची वारंवार भेट घेत मागणी केली


3) वर्धा शहरात मूक मोर्चा काढलाय


4) आता बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. 


 बेमुदत उपोषणाला 15 दिवस झाले. स्थानिक आमदारांचे उपोषण मंडपाकडे साधे लक्षही गेले नाही, तर जिल्हा प्रशासनाने देखील पाठ फिरवली आहे. मदतीच्या अपेक्षेत असणाऱ्या मृतकांच्या कुटुंबीयांनी  वर्ध्यात आता साखळी उपोषण सुरू केलय. आगीत होरपळलेल्या मृतकांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हे ही वाचा :


Samruddhi Mahamarg : भाजपा कार्यकर्त्यांकडून समृद्धी महामार्गाचा वाढदिवस साजरा; टोल प्लाझावर कापला केक