नवी मुंबई : पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्यानंतर आता भाजीपाल्याच्या दरांनीही उसळी घेतली आहे. नवी मुंबईत सध्या भाजीपाल्याच्या दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.


पावसामुळे भाज्यांची आवक वाढत असते. मात्र यंदा पाऊसच नसल्याने भाजीपाल्याची आवक घटल्याचं चित्र आहे. येत्या 2 -3 दिवसात पावसाने राज्यात हजेरी लावली तर दर पुन्हा जागेवर येवू शकतात, असं बाजार समितीतील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

पावसाची आणखी 24 तास वाट पाहावी लागणार!

राज्यात मान्सूनच्या दमदार हजेरीसाठी आणखी 24 तास वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. अरबी समुद्रातंलं वातावरण अनुकूल नसल्याने कमी दाबाचा पट्टा पुढे सरकरण्यात अडचणी येत आहेत.

पावसाने जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावण्याची शक्यता आहे.

पेरण्या खोळंबल्या, अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ

मराठवाडा आणि विदर्भात पाऊस नाही. तर कोल्हापुरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण सध्या पावसाने तिथेही ओढ दिली आहे. जून महिन्यात इथे सरासरी 337 मीमी पाऊस पडतो, पण आतापर्यंत फक्त 63 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त 16 टक्के पेरणी झाली आहे.

ज्यांनी पेरणी केलीय ते शेतकरी आता पावसाची अतुरतेने वाट पाहत आहेत. तर तिकडे चंद्रपुरातही अशीच स्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त 35 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

या अत्यल्प पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडेल या आशेने कापसाची लागवड आणि सोयाबीनची पेरणी केली होती, ते आता चांगलेच संकटात सापडण्याची शक्यता आहे.