कानपूर: देशाच्या विविध भागांमध्ये धार्मिक तेढ वाढण्याच्या घटना घडत असताना कट्टरवाद्यांची वादग्रस्त वक्तव्यं सुरूच आहेत. हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही देशासाठी द्या असं आवाहन साध्वी ऋथंबरा (Sadhvi Rithambara) यांनी केलं आहे. भारत लवकरच हिंदू राष्ट्र बनेल असंही त्या म्हणाल्या. दिल्लीतील जहांगिरीपूरीमधील धार्मिक दंगलीवरुन त्या कानपूरमध्ये बोलत होत्या. 


रविवारी निराला नगर येथे राम महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना साध्वी ऋथंबरा म्हणाल्या की, "ज्या लोकांनी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक केली त्या लोकांना देशाचा विकास झालेलं बघवत नाही. जे लोक राजकारणाचा वापर करुन हिंदू समाजाची विभागणी करायचा प्रयत्न करत आहेत त्यांना मातीत मिळवलं जाईल. भारत हे लवकरच हिंदू राष्ट्र होणार आहे."


 






हिंदूंनी प्रत्येकी चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यामधील दोन मुलं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावीत. त्या मुलांना विश्व हिंदू परिषदेशी जोडून देशाला समर्पित असं आवाहन करताना साध्वी ऋथंबरा म्हणाल्या की, देशामधील भविष्यातील लोकसंख्या संतुलन बिघडू द्यायचं नसेल तर समान नागरी कायदा लागू करावा. जर लोकसंख्येमधील संतुलन बिघडलं तर देशाचे भवितव्य धोक्यात येईल. 


साध्वी ऋथंबरा या राम मंदिर आंदोलनाशी संबंधित आहेत. विश्व हिंदू परिषदेशी संबंधित असलेल्या महिला आघाडी दुर्गा वाहिनीच्या त्या संस्थापिका आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या: