उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नाही तर पक्ष चालवण्यासाठी- चंद्रकांतदादा पाटील


कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नाही तर पक्ष चालवण्यासाठी झाला असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी जो अनुभव लागतो तो उद्धव ठाकरे यांच्याकडे नसून अचानक आलेल्या जबाबदारीमुळे ते गोंधळून गेल्याचे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री सक्षम नसल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले असून मराठा समाजालाही त्याचा फटका बसल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


मराठा समाजाने सांगितले आणि आंदोलनाचे नेतृत्व भाजपकडे दिले तर सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिक्षणामधले आरक्षण दिले नसल्याचा त्यांनी निषेध करत तज्ज्ञ लोकांशी सरकारने सल्लामसलत करण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे हे संघटना चालवण्यासाठी योग्य आहेत. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काम प्रशासन चालवण्याच्या इतपत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. अजित पवार यांनी आमच्या दुखण्याबाबत बोलू नये त्यासाठी आवश्यक डॉक्टर आमच्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संजय राऊत यांनी ईडीकडे त्वरित नावं द्यावीत- चंद्रकांत पाटील


ईडीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातली चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपण इकडे शेकडो नाव देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर टीका करताना राऊत यांच्या तोंडामुळेच शिवसेनेचे मोठे नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. संजय राऊत यांनी त्वरित ईडीडे नावे द्यावीत आम्ही कुठल्याही धमकीला घाबरत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.