ABP CVoter Survey: मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Voilence) मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, त्यावर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात विचारण्यात आलं की, मणिपूरवर सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नाच्या उत्तरात 51 टक्के लोकांनी 'हो' म्हटलं, तर 38 टक्के लोकांनी 'नाही' असं उत्तर दिलं आहे, तर 16 टक्के लोकांनी याचं उत्तर दिलेलं नाही.


मंगळवार (8 ऑगस्ट) ते गुरुवार (10 ऑगस्ट) या कालावधीत केंद्र सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा झाली. लोकसभेचं सदस्यत्व बहाल झाल्यानंतर राहुल गांधी यांनीही संसदेत पोहोचून या चर्चेत भाग घेतला.


राहुल गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल


मणिपूरमध्ये या लोकांनी (सरकारने) संपूर्ण भारताची हत्या केली आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटलं आहे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मणिपूर भेटीदरम्या त्यांना भेटलेल्या काही महिलांची गोष्टही सांगितली. एवढंच नाही, तर सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही देशभक्त नाही तर देशद्रोही आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात.


'पंतप्रधान मोदी दोन लोकांचं ऐकतात'


राहुल गांधी यांनी संसदेत नूह हिंसाचाराचा मुद्दा देखील उपस्थित केला आणि नरेंद्र मोदी फक्त दोनच लोकांचं ऐकतात, असं राहुल गांधींनी म्हटलं. हनुमानाने लंका जाळली नाही, तर रावणाच्या अहंकाराने लंका जाळली असल्याचं म्हणत राहुल गांधींनी घणाघाती टोला लगावला. तुम्ही देशभर रॉकेल फेकत आहात, तुम्ही मणिपूरमध्येही रॉकेल फेकलं आणि मग मणिपूर पेटवलं, असं राहुल गांधी म्हणाले. आता तुम्ही हरियाणात देखील तेच करत आहात, असंही राहुल गांधी म्हणाले.


पंतप्रधान मोदींचं उत्तर


त्याचवेळी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदींनी दोन तासांहून अधिक काळ भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनाही घेरलं. विरोधकांचा आमच्या सरकारवर विश्वास नसला तरी देशातील जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि यापुढेही राहील, असं पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले.


काँग्रेस अयशस्वी उत्पादन लाँच करत आहे - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर देत काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून अयशस्वी उत्पादनं वारंवार लाँच करत असल्याचं सांगितलं. प्रत्येक वेळी काँग्रेसतं लाँचिंग फेल होत असल्याचं मोदी म्हणाले. काँग्रेस प्रेमाच्या दुकानाची चर्चा करते, पण त्यांचं दुकान लुटीचं दुकान आहे, भ्रष्टाचाराचं दुकान आहे, लुटीचा बाजार आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.


टीप - संसदेत अविश्वास प्रस्तावावर झालेल्या चर्चेनंतर एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने अखिल भारतीय सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणात 3 हजार 767 लोकांची मतं घेण्यात आली. सर्वेक्षणातील त्रुटीचं मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.


हेही वाचा:


Chandrayaan 3 vs Luna 25: चांद्रयान-3 पूर्वी चंद्रावर लँड होणार लुना-25; फोटोंमधून पाहा दोघांमध्ये किती असेल अंतर?