मुंबई : फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने घोषणा केली खरी, पण 22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करायचं ठरलं तरी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.


कारण नाफेडने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली तरी, नोंदणी झालेली तूर खरेदी करण्यासाठी महिना उलटण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडायला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतरही तूर खोळंबा कायम राहण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, त्यांची तूर 5 हजार 50 रुपये हमीभावाने खरेदी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

व्यापाऱ्यांकडे तुरीला साडे तीन ते चार हजार रुपये भाव आहे. मात्र सरकार नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार आहे. यासाठी सरकार एक हजार कोटी रुपये अधिकचे उपलब्ध करून देईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोणत्या बाजार समितीत किती तूर शिल्लक?

  • अमरावती – अचलपूर बाजार समितीत 40 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. तर 25 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.

  • सोलापूर – माढा बाजार समितीत 19 हजार 700 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 5 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.

  • लातूर – लातूर, चाकूर, जळकोट बाजार समित्यांमध्ये 75 हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.

  • उस्मानाबाद – बाजार समितीमध्ये 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.

  • अहमदनगर – बाजार समितीमध्ये 2 लाख 7 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. 25 हजार क्विंटल तूर शिल्लक.

  • नांदेड – बाजार समितीमध्ये 1 लाख 12 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक.

  • जालना – बाजार समितीमध्ये 1 लाख 42 हजार 665 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 29 हजार क्विंटल तूर शिल्लक.

  • धुळे – बाजार समितीमध्ये 29 हजार 794 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 400  क्विंटल तूर शिल्लक.

  • नंदुरबार – बाजार समितीमध्ये 28 हजार 405 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 4 हजार क्विंटल तूर शिल्लक.

  • बीड – बाजार समितीमध्ये 2 लाख 80 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.

  • अकोला – सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून आतापर्यंत 2 लाख 58 हजार 388 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.

  • वर्धा – जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 14 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.

  • यवतमाळ  – जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 3 लाख 75 हजारांपेक्षा जास्त तूर शिल्लक


संबंधित बातम्या :

शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!


सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय


काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक


तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च


तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना


नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा