Kalyan Traffic Updates :  नवी मुंबई आणि कल्याण येथील नागरिकांचा नवीन वर्षातील प्रवास अधिक सुखकर होणार असून वाहतुकीचे सर्व अडथळे दूर होणार आहेत. शिळफाटा उड्डाणपुलाच्या (Shilphata Flyover) तीन मार्गिका 15 जानेवारीपासून सेवेत येणार आहे.  कल्याण लोकसभा मतदारसंघाचे (Kalyan Lok sabha) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील  वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडविण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांची खासदार डॉ. शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली.  यावेळी सर्व प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या. 


नवी मुंबई आणि कल्याण येथील नागरिकांचा नवीन वर्षातील प्रवास अधिक सुखकर होणार असून वाहतुकीचे सर्व अडथळे दूर होणार आहेत. तर या नवीन प्रकल्पांमुळे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तर ऐरोली आणि काटई येथील बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील ४५ मिनिटांचे अवघ्या 5 ते 10 मिनिटांवर येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. 


उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाही वाहतूक कोंडी होणार नाही


कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प गतीने करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिळफाटा उड्डाणपुलाचे प्रगतीपथावर असलेले काम लवकरच बहुतांशी पूर्ण होणार आहे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत यातील तीन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. तर येथील ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार आहे. या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर शिळफाटा महापे या पाईपलाईन रस्त्यावर उपलब्ध जागेत रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार असून येथेही वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करता येणार आहे. या कामामुळे येथील उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, तेव्हाही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे, असेही यावेळी खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.


गेल्या काही वर्षात शिळफाटा कल्याण रस्ता सहा पदरी केल्याने येथील वाहतुकीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सोबतच या भागातील वाहतूक अधिक वेगवान व्हावी, यासाठी येथे मुंब्रा वाय जंक्शन पुल उभारण्यात आला. येथेच ऐरोली - काटई उन्नत मार्ग, शिळफाटा उड्डाणपूल उभारला जात आहे. शेजारी महापे रस्त्यावर जाण्यासाठी असलेल्या पाईपलाईन रस्त्यावर उड्डाणपूल उभारून कोंडीमुक्त वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात येथील वाहतूक वेगवान होणार असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले. 


प्रवास वेगवान होणार 


डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिळफाटा ते कल्याण फाटा उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. सध्या याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या तीन मार्गिका येत्या 15 जानेवारीला खुल्या होतील, अशी माहिती यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे कल्याण फाटा ते शिळफाटा रस्त्यावर होणारी जवळपास सर्वच वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. विनाथांबा प्रवास लवकरच शक्य होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे. याचवेळी त्यांनी ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला. डाव्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून येथील विद्युतीकरणाचे काम पूर्ण तातडीने पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे बोगद्याची डावी बाजू फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहतुकीस खुली करण्यात येणार असल्याचीही माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. ही मार्गिका खुली झाल्यास मुंब्रा येथून थेट ठाणे - बेलापूर रस्त्यावर जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा मोठा वेळ वाचणार आहे. या बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई ते काटई येथील 45 मिनिटांचे अंतर केवळ पाच ते दहा मिनिटांवर येणार आहे. या ऐरोली काटई उन्नत मार्गाची एकूण लांबी 12.3 किलोमीटर इतकी आहे. यातील पहिला टप्पा - ठाणे बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा एकूण 3.43 किलोमीटर लांबीचा आहे. तर या मार्गातील बोगदा 1.68 किलोमीटरचा आहे. त्यामुळे येत्या काळात येथील वाहतूक वेगवान होणार आहे.