Thane: भिवंडी उप-विभागीय कार्यलयात मतदार नोंदणीसाठी (Voter Registration) आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमणात गैरसोय होऊन नोंदणी करताना असुविधेचा फटका बसत असल्याच्या तक्रारी भिवंडी (Bhiwandi) पूर्वेतील समजावादीचे आमदार रईस शेख यांच्याकडे आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी गुरुवारी (8 जून) थेट उप-विभागीय कार्यलय गाठलं. मात्र त्यावेळी उप-विभागीय अधिकारी सानप हे कार्यलयात उपस्थित नसल्याचं पाहून त्यांनी कार्यालयातच जमिनीवर बसून ठिय्या मांडला होता. 

Continues below advertisement

आगामी भिवंडी महापालिका निवडणुकांसह (Palika Election) विधानसभा (Vidhan Sabha) , लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) नव्याने मतदार नोंदणी भिवंडीतील उप-विभागीय कार्यलयात सुरु आहे. मात्र याठिकाणी नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत असतो, काही मतदारांची तर अपुऱ्या माहितीवरच नोंदणी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार शेख यांनी केला आहे. विशेष म्हणजे या कार्यलयात नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने शेकडो नागरिक तासनतास  ताटकळत उभे राहून आपले कार्यलयीन कामकाज उरकून घेतात. 

यापूर्वी आमदार शेख यांनी या संदर्भात पत्रव्यवहार करून उप-विभागीय अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली होती. मात्र त्यांच्या पत्रव्यवहाराने शासनाच्या कामकाजात काहीच फरक पडला नाही, असं आमदार शेख यांनी सांगत अचानक कार्यलयात जाऊन जमिनीवरच ठिय्या मांडला.  यावेळी त्यांनी पुन्हा बोगस मतदार आणि मृत मतदारांची नावं यादीतून वगळ्यात यावी, अशी मागणी देखील आमदार शेख यांनी केली. त्यानंतर एका तासाने उप-विभागीय अधिकारी सानप हे कार्यलयात आले. त्यावेळी त्यांनी आमदारांशी चर्चा करून त्यांचे पुन्हा निवेदन स्वीकारले आणि तीन महिन्याच्या आत मतदार यादीतील घोळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिलं, त्यामुळे आमदार शेख यांनी आपलं ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केलं, मात्र तीन महिन्यानंतरही मतदार यादीतील घोळ असाच कायम राहिला तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी दिला आहे.

Continues below advertisement

दरम्यान, भिवंडी उप-विभागीय कार्यलयात दलालाचाच राबता असून याठिकाणी आल्यावर दलालामार्फत पैसे देऊन अनेकांची कामं एका झटक्यात होत असल्याने हे कार्यालय आता दलालाच्या ताब्यात आहे की काय? असा प्रश्न आमदार शेख यांनी उपास्थित करून खळबळ उडवून दिली आहे. यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का? हा एक प्रश्नच आहे.

हेही वाचा:

Corruption In Maharashtra: राज्यात चिरीमिरी जोरात; 377 जणांना रंगेहाथ पकडले...9 प्रकरणात आरोप सिद्ध...12 जणांना शिक्षा