मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभारही स्वीकारला. मात्र आज उद्धव ठाकरे सरकारची खरी परीक्षा असणार आहे. विधानसभेचे कामकाज उद्यापासून दोन दिवस चालणार आहे. आज, शनिवारी महाविकास आघाडीच्या सरकारची बहुमत चाचणी होणार असून उद्या अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांची निवड होणार आहे. महाविकास आघाडी सरकारला तीन डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय देण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. परवा, रविवारी देखील विधानसभा सुरु राहणार असून या दिवशी अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.





विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम :

  • विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता

  • विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आहे

  • नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत

  • नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत


उद्धव ठाकरेंनी स्वीकारला पदभार
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. काल उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मंत्रालय परिसरात लगबग सुरु होती. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. मंत्रालयात या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. तसेच उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

आरे कारशेडला स्थगितीची घोषणा
मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडच्या कामाला काल पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे सांगितलं. रातोरात झाडांची कत्तल कधीही मान्य नाही, असेही ते म्हणाले. आपले वैभव नष्ट करुन विकास आम्हाला नको आहे, असेही ते म्हणाले.

आरे कारशेडला स्थगिती, मेट्रोला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा