सिंधुदुर्ग : डिजिटल इंडियाची कास धरत कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी वायफाय सुविधा देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. याची पूर्तता करत कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर आजपासून वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या वायफाय सेवेची सुरुवात केली.


सिंधुदुर्गमध्ये कुडाळ येथे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ही सुविधा प्रवाशांना समर्पित करण्यात आली. या कार्यक्रमात कुडाळ आणि चिपळूण स्थानकांवर प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या वाढीव सुविधांचे लोकार्पण प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

‘रेल बढे.. देश बढे’ ही उक्ती सिद्ध करण्यासाठी भारतीय रेल्वेने साडे आठ लाख कोटी रुपयांचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कुडाळ येथे फलाटांची रुंदी वाढवण्यात आली, प्रवासी शेड बांधण्यात आल्या, व्हीआयपी प्रतिक्षालाय बांधण्यात आले आहे.

देशाच्या विकासासाठी रेल्वेचा विकास होण्याची गरज लक्षात घेऊन रेल्वे विकासासाठी विविध विकास कार्यक्रम हाती घेतल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.