नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून 30 जानेवारी म्हणजेच आजपासून एअरसेल सिमकार्ड बंद होणार असल्याच्या बातम्या झळकत होत्या. मात्र महाराष्ट्रात तरी एअरसेल बंद होणार नाही.


एअरसेल बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण एअरसेलने ग्राहकांना मेसेजद्वारे दिलं आहे.



महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश,हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यातील परवाने एअरसेलने परत केल्याचं म्हटलं आहे.

मात्र एअरसेल कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ग्राहकांच्या नंबरवर मेसेज करुन, एअरसेल बंद होणार नाही, असं स्पष्ट केलं.

एअरसेल बंद होणार असण्याच्या भीतीने ग्राहक पोर्टसाठी मेसेज करतात, त्यावेळी त्यांना असे मेसेज येत आहेत.

त्यामुळे किमान महाराष्ट्र/मुंबईतील ग्राहकांना तरी दिलासा मिळाला आहे.