नागपूर : टीव्हीवर आपण जपान, चीन आणि इतर प्रगत देशात रोबो अनेक मानवी कामे करताना पाहतो. त्यांच्या कामातील अचूकता आणि तत्परता पाहून अचंबित होतो. मात्र, हेच रोबो आता चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाऊ घालत आहे. नागपुरात राज्यातील पहिले रोबो हॉटेल सुरु झाले आहे. 'रोबो टू पॉईंट जिरो' असं या हॉटेलचं नाव आहे. हॉटेल सध्या त्यांच्या रोबोटिक वेटर्समुळे नागपूरकरांच्या पंसतीस उतरले आहे.


हातातल्या ट्रे मध्ये चमचमीत आणि चविष्ट खाद्य पदार्थ घेऊन येणारे हे रोबो पाहून तुम्ही टोकियो किंवा शांघायच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्यासारख वाटत. नागपूरच्या इटर्निटी मॉल मध्ये राज्यातले पहिले "रोबो हॉटेल" सुरु करण्यात आले आहे. "रोबो टू पॉईंट जिरो" नावाने सुरु झालेला हे हॉटेल इथल्या तीन रोबो वेटर्समुळे सध्या नागपूरकरांच्या पसंतीस उतरत आहे . रोबो हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अभिवादन करतात आणि त्यांच्या पर्यंत मेनू कार्ड पोहचवतात. एवढचं नाही तर ग्राहकाने एकदा ऑर्डर दिल्यावर किचनमधून ते खाद्य पदार्थ टेबलपर्यंत आणून देतात. त्यापुढचं काम म्हणजेच पदार्थ ताटात वाढण्याचे काम मात्र मानवी वेटर्स करतात. नागपुरातच काय तर भारतात कधीच अशी संकल्पना न पाहिल्याने ग्राहक या रोबोरुपी वेटर्स वर जाम खुश आहेत.

हॉटेलमध्ये आलेले ग्राहक सुरुवातीला रोबोरुपी वेटर्स पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होतात. नंतर मात्र या रोबो सोबत सेल्फी काढणे, त्यांचे व्हिडीओ बनवणे असे उपक्रम सुरु होतात. या रोबोला फिरण्यासाठी हॉटेलच्या फ्लोरवर एक मॅग्नेटिक पाथ / मार्ग ( रेल ) बनवण्यात आली आहे. त्यावर फिरत हे रोबो प्रत्येक टेबलापर्यंत पोहोचतात. मात्र, हे रोबो ग्राहकांसोबत अभिवादन आणि इतर काही मोजकेच वाक्ये बोलतात. त्यांनी ग्राहकांशी मनसोक्त संवाद साधावा अशी अपेक्षाही काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

हॉटेलचे मॅनेजर संदीप शेंडे यांच्या मते रोबो टू पॉईंट जिरो हॉटेल महाराष्ट्रातील पहिले रोबो हॉटेल आहे. जपान मधून हे रोबो नागपुरात आल्याच्या दिवसापासून त्यांनी नागपूरकरांच्या मनात घर केले आहे. हे रोबो आल्यानंतर ग्राहकांची संख्या एवढी वाढली आहे की हॉटेलमध्ये यांत्रिकीकरण झाल्यानंतरही एकही वेटर ची संख्या कमी करावी लागली नाही.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासासह यांत्रिकीकरण वाढते. मात्र याच यांत्रिकीकरणामुळे रोजगार कमी होतात असा ही आरोप होतो. मात्र, नागपुरात या रोबोरूपी वेटर्समुळे सध्या तरी कोणाच्या ही रोजगारावर संकट आलेले नाही. उलट त्यांनी ग्राहकांची संख्या वाढवून नवे रोजगार निर्माणच केले आहे.