नवी दिल्ली : देशात सध्या सहा कोटींपेक्षा जास्त ग्राहक रिलायन्स जिओच्या मोफत इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग सेवेचा लाभ घेत आहेत. यामुळे इतर दूरसंचार कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी एकत्र येत सरकारकडे आणि 'ट्राय' म्हणजे दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडेही तक्रार केली आहे.


जिओच्या मोफत ऑफरमुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची दूरसंचार कंपन्यांची तक्रार आहे. त्यातच कॉल ड्रॉपच्या समस्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

रिलायन्सने जिओची ऑफर तीन महिन्यांसाठी आणखी वाढवल्यानंतर इतर कंपन्यांच्या अडचणींमध्ये अजूनच वाढ झाली. त्यामुळे एअरटेलने आता रिलायन्स जिओची ऑफर वाढवण्यासाठी परवानगी देण्याच्या 'ट्राय'च्या निर्णयाविरोधात दूरसंचार विवाद प्राधिकरण टीडीसॅटकडे याचिका दाखल केली आहे.

दूरसंचार प्राधिकरणाने रिलायन्सच्या विरोधात निकाल दिला तर 31 मार्चपूर्वीच ही ऑफर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दूरसंचार प्राधिकरण काय निकाल देणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

काय आहेत एअरटेलचे आक्षेप?

'ट्राय'ने रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग ऑफर 31 डिसेंबरनंतर बंद करावी, असं एअरटेलने म्हटलं आहे.

'ट्राय'च्या नियमांचं मार्च 2016 पासून उल्लंघन केलं जात असून यामुळे एअरटेलचं नुकसान होत आहे. शिवाय मोफत व्हॉईस कॉलिंगमुळे एअरटेल नेटवर्कलाही अडथळा येत असल्याचा आरोप एअरटेलने केला आहे.

दरम्यान 'ट्राय'ने एअरटेलच्या या याचिकेवर उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे टीडीसॅटने पुढच्या सुनावणीवेळी उत्तर देण्याचे 'ट्राय'ला आदेश दिले आहेत. याची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2017 ला होणार आहे.