मुंबई : केवळ सहा महिन्यात 10 कोटी ग्राहक जोडणाऱ्या रिलायन्स जिओमुळे भारताने 4G सेवा उपलब्धतेच्या बाबतीत 15 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुधवारी लंडन येथील वायरलेस कव्हरेज मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.


भारतात 2016 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 4G सेवेची उपलब्धता 71.6 टक्के होती. तर आता 2017 सालच्या पहिल्या तिमाहीमध्ये ही उपलब्धता 81.6 टक्क्यांवर आली आहे, असं ओपन सिग्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भारतातील मोबाईल मार्केट सर्वात वेगाने बदलणारं मार्केट आहे. त्यामुळे सरकारला आणि दूरसंचार कंपन्यांना सगळ्याच बाबतीत जागतिक स्तरावर प्रगती करावी लागेल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता येईल, असं ओपन सिग्नलचे सीईओ ब्रेंडन गिल यांनी म्हटलं आहे.

4G डाऊनलोडिंगमध्ये भारत पिछाडीवर

भारत 4G डाऊनलोडिंग स्पीडच्या बाबतीत चांगलाच पिछाडीवर असल्याचंही या रिपोर्टमधून समोर आलं आहे. भारतात 4G डाऊनलोडिंग स्पीड सरासरी 5.1 एमबीपीएस आहे, जे 3G पेक्षा किंचीत जास्त आहे. 3G चा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 4.4 एमबीपीएस एवढा आहे.

4G डाऊनलोडिंग स्पीडच्या बाबतीत दक्षिण कोरियाने बाजी मारली आहे. 4G डाऊनलोडिंग स्पीडमध्ये दक्षिण कोरियाने दुसरा क्रमांक मिळवला. ओपन सिग्नलने या रिपोर्टमध्ये 75 देशांचा अभ्यास केला.