संशोधन : फेसबुकमुळे मानसिकता संकुचित होत आहे
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2017 10:34 AM (IST)
नवी दिल्ली : फेसबुकच्या अतिवापरामुळे मानसिकता ही संकुचित होत आहे. कारण फेसबुकवर स्वतःला आवडणाऱ्या बातम्या आणि स्वतःच्या मताशी जुळणाऱ्या विचारांनाच आपण प्राधान्य देतो. सोशल मीडिया हा आपल्याला स्वतंत्र, पक्षपाती बनवतो किंवा तसं होण्यास भाग पाडतो, असं एका संशोधनात म्हटलं आहे. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. फेसबुक युझर्स त्यांच्या मताशी जुळणाऱ्या पोस्टला लाईक करतात, शेअर करतात आणि इतर पोस्टवर दुर्लक्ष करतात, असं संशोधनात आढळून आल्याचं संशोधकांनी सांगितलं. फेसबुक युझर्सचा समज ज्या प्रकारचा आहे, त्याच प्रकारच्या गोष्टी ते फेसबुकवर शेअर करतात, असं संशोधक अलेसँद्रो बेसी यांनी सांगितलं. हे संशोधन पीएएनएस या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.