जिओ इफेक्ट : आयडियाला 400 कोटींचा फटका
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2017 10:06 AM (IST)
मुंबई : रिलायन्स जिओच्या आगमनानंतर टेलिकॉम क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांना फटका बसला आहे. आयडिया सेल्युलर कंपनीला 2016-17 च्या चौथ्या तिमाहीत तब्बल 328 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 2016-2017 या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरला एकूण 400 कोटींच्या नुकासनाला सामोरं जावं लागलं आहे. 2015-16 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्युलरने 452 कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. शिवाय, गेल्या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरचा नफा 2 हजार 728 कोटी होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अहवालानुसार, 2016-17 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 14.3 टक्क्यांची घट झाली असून, चौथा तिमाहीत 8 हजार 126 कोटींच्या महसुलाची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत 9 हजार 478 कोटींच्या महसुलाची नोंद झाली होती. 2016-17 मध्ये आयडिया सेल्युलरचा महसूल 35 हजार 576 कोटी असून, 2015-16 मध्ये 35 हजार 949 कोटी इतका महसूल होता. दरम्यान, बिर्ला समूहाने आपली टेलिकॉम कंपनी आयडियाला व्होडाफोनमध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.