नवी दिल्ली : भारतीय प्रतिस्पर्धा आयोग म्हणजेच सीसीआयने सर्च इंजिन गुगलला 136 कोटींचा दंड ठोठावला आहे. भारतीय बाजारात सर्च रिझल्टमध्ये चुकीचा व्यवहार केल्याचा गुगलवर आरोप आहे. 2012 साली दाखल झालेल्या तक्रारीवर आयोगाने ही कारवाई केली.


स्पर्धा विरोधी व्यवहार प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मॅट्रीमनी डॉट कॉम आणि कंझ्यूमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने ही तक्रार दाखल केली होती. जवळपास सहा वर्षांनी सीसीआयने या तक्रारीवर निर्णय दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जागतिक स्तरावर गुगलवर दंड ठोठावण्याचं हे अनोखं प्रकरण आहे. गुगलने ऑनलाईन सर्च इंजिन मार्केटमधील आपल्या दबदब्याचा फायदा घेत सर्चमध्ये भेदभाव आणि अफरातफर केली आणि याचमुळे प्रतिस्पर्धी कंपन्या आणि ग्राहकांना नुकसान झालं, असा आरोप गुगलवर आहे.

सीसीआयच्या आदेशानुसार, गुगलला ठोठावलेला हा दंड 2013, 2014 आणि 2015 मधील ऑपरेशनल इनकमच्या पाचपट आहे. एकूण 135.86 कोटींचा हा दंड आहे. गुगलने तक्रारीवर जे स्पष्टीकरण दिलं, त्याचा गांभीर्याने विचार करत हा दंड ठोठावण्यात आला. गुगलला हा दंड 60 दिवसांच्या आत जमा करावा लागणार आहे.