मुंबई : स्मार्टफोन आणि मोबाईल डेटा क्षेत्रात जबरदस्त ऑफर्सने ‘धन धना धन’ करणाऱ्या रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रातील डेटा दरांचे सर्व समीकरणं मोडीत काढले आहेत. मात्र मुकेश अंबानींच्या या ड्रीम प्रोजेक्टने त्यांचे छोटे बंधू अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनची (आरकॉम) डोकेदुखी वाढली आहे.


अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनीवर मार्च 2017 पर्यंत 45 हजार 733 कोटी रुपयांचं कर्ज आहे. या कर्जाचं ओझं 25 हजार कोटी रुपयांनी कमी करण्यासाठी अनिल अंबानी मोबाईल टॉवर व्यवसाय एका कंपनीला विकणार असल्याचं बोललं जात आहे. यातच आरकॉम कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं बोललं जात आहे.

अनिल अंबानी यांच्या कंपनीत महसुलासोबतच नफ्यामध्येही मोठी घट झाली आहे. या आठवड्यातच आरकॉमच्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार कंपनीचा महसूल जानेवारी ते मार्च 2017 या तिमाहीत 24 टक्क्यांनी कमी होऊन तो 4 हजार 524 रुपयांवर आला आहे. तर अखेरच्या तिमाहीत कंपनीला 948 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. विशेष म्हणजे कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहीत 79 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

रिलायन्स जिओच्या ऑफरनंतर सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांनी जिओला पसंती दिली आहे. मात्र मुकेश अंबानींच्या जिओने अनिल अंबानींच्या आरकॉमवर मोठा आघात केल्याचं चित्र आहे. कारण आरकॉमच्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीला पाठ दाखवल्याचं चित्र आहे.

मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओची 4 जी सेवा लाँच केली. त्यानंतर दूरसंचारक्षेत्रात डेटा दर आणि कॉल दर कमी करण्याची स्पर्धाच लागली. आयडिया, व्होडाफोन, एअरटेल यांसारख्या कंपन्यांनी आकर्षक ऑफर्स देऊन आपल्या ग्राहकांना थांबवण्यात यश मिळवलं. मात्र आरकॉमला जिओच्या ऑफर्सचा मोठा तोटा झाल्याचं चित्र आहे.