मुंबई : राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ आणि महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.


सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण इतर राज्यात कांदा पाठवल्यानंतर कांद्याची मागणी वाढणार आहे. कांदा इतर राज्यात निर्यात करण्याबाबत मंत्रालयातील दालनात पणन मंडळ आणि महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील कांदा इतर राज्यात निर्यात करण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी, कांदा उत्पादक शेतकरी यांचं 10 जणांचं शिष्टमंडळ तयार करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

या पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जाऊन त्याठिकाणी असलेली कांद्याची आवक-जावक, राज्यातील कांदा साठवण्यासाठी लागणारे गोदाम, बाजार भाव, लहान व्यापारी याबाबत माहिती घ्यावी, असे आदेश सदाभाऊ खोत यांनी दिले.

प्रायोगिक तत्वावर कांदा निर्यात करण्यासाठी 5 ट्रक भाड्याने घेण्यासाठी आणि पंजाब बाजार समितीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून गोदाम घेण्यासाठी पणन मंडळाने तरतूद करावी, असे आदेश सदाभाऊ खोत यांनी दिले.

दिल्ली सरकारची राज्यात धान्य आणि इतर साहित्य विक्रीसाठी रेशन दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कांदा दिल्लीमध्ये विक्री करण्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करण्याबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला.