CM Eknath Shinde : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरु आहे. मुंबई, ठाण्यासह  महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जात असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी केलं. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लोकनाथ स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, सुंदर चैतन्य स्वामी, श्री. प्रल्हाद दास, भक्तीप्रेम स्वामी, कृष्णकांत दास उपस्थित होते.

Continues below advertisement




मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल


विश्व बंधुत्व, ऐक्य, एकता, सहिष्णूता, शांती निर्माण करण्यासाठीचे माध्यम भुवैकुंठ ठरेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इस्कॉनच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणत लाभ घेतात. 15 एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती, बाल संस्कार वर्ग, अन्नछत्र, गोशाळा संवर्धन, संशोधन, भक्त निवास असे विविध उपक्रम होणार आहेत. मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व  सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेचा सेवा करण्याची संधी मिळाली असून, सेवक म्हणून काम करणार आहे.  राज्याला सुजलाम सुफलाम करुन विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदीर परिसरातील प्रभुपाद घाटाची पाहणी देखील केली आहे. 




मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची  शासकीय महापूजा संपन्न


आज आषाढी एकादशी आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करुन आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या: