Prakash Ambedkar :  मराठा आरक्षण मोर्चाचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना होणार असून हीच हवा राहिली तर या लोकप्रियतेचे रूपांतर मतात होईल असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत आंबेडकर यांनी भाष्य केले. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विश्लेषण करताना आंबेडकर यांनी म्हटले की,  फायदा जरी शिंदे गटाला होत असला तरी भाजप पासून मात्र मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज दूर गेले असल्याची स्थिती आहे. 


माढा येथे ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाद्वारे ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
 


काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य संपुष्टात


काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे  राष्ट्रीय पातळीवरचे भवितव्य संपले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम करतोय. एकीकडे राहुल गांधीमार्फत पक्ष वाढविण्याचे काम चालू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतून काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना पुढे करण्याचे काम चालू आहे. भारत जोडो यात्रा पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणाहून जाणार आहे. या ठिकाणी प्रमुख असलेले तृणमूल कॉंग्रेस आणि जेडीयू यांना सामावून घेतले जात नाही. याच ठिकाणी पक्ष वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन काँग्रेस इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीयरित्या धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.काँग्रेसच्या अशा भूमिकेमुळेच केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि आता नितीशकुमार यांनी वेगळी वाट धरली आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे भवितव्य संपले असल्याची टीका त्यांनी केली.
  
महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून 30  जानेवारीला चर्चेचे निमंत्रण आम्हाला मिळाले असून त्या चर्चेसाठी जाऊन आम्ही आमचे मुद्दे मांडू. काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करु. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे जे झाले ते महाविकास आघाडीत व आमच्यात होऊ नये यासाठी प्रयत्न करु असे आंबेडकर म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण झाली आहे. यापुढील काळात ती वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.