Ashadhi Wari 2022 : विठुरायाच्या ओढीने लाखो भाविक पंढरीत आषाढीसाठी आले असताना विठ्ठलाच्या प्रसादाच्या नावावर भाविकांना चुना लावण्याचे काम आज उघडे पडले. विठ्ठलाचा लाडू प्रसादाचा ठेका एका नाशिकच्या कंपनीला दिला होता मात्र लाडू बनविण्यासाठी जे अन्न व औषध प्रशासनाच्या नियमाला हरताळ फासून भाविकांसाठी हे लाखोंच्या संख्येने लाडू बनविणे सुरु होते. यावर माझाने आवाज उठवल्यावर आणि मंदिर समितीने नोटीस दिल्यानंतरही कामात सुधारणा झाली नव्हती . 


आत्ता तर यापेक्षा भयानक प्रकार समोर आला असून भाविकांना १४० ग्रामचे लाडू प्रसादासाठी मंदिर समितीने किंमत थेट दीडपट वाढवली मात्र या लाडूंचे वजनाचं कमी भरू लागल्याने हा थेट भाविकांना चुना लावायचा धंदा या ठेकेदार आणि समितीकडून सुरु झाला होता . याबाबत नितीन काळे या सामाजिक कार्यकर्त्याने सोलापूर येथे वजन मापे विभागाकडे लेखी तक्रार दिल्यावर आज या कारखान्यावर वजन मापे पथकाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता लाडूचे वजन १२० ते १२५ ग्राम असे भरल्याचे आपल्या कॅमेरा मध्ये दिसून आले आहे . याबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी अजून अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी यात अनियमितता आढळल्याची कबुली दिली आहे.


देवाच्या दारात भाविकांच्या खिशाला आधी लाडू प्रसादाची दरवाढ करून कात्री लावली गेली आणि आता थेट लाडूच्या वजनात चोरी करून उघड उघड फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने भाविकांच्या संतापाची लाट उसळली आहे . आता या ठेकेदारांचा ठेका रद्द करून मंदिर समितीमधील जे त्याला पाठीशी घालत होते त्यांचेवर देखील तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदार नितीन काळे यांनी केली आहे . ज्या पद्धतीने लाडू बनविताना जी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक होते ती तर घेतली जात नसल्याने भाविकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरु असून आता तर थेट वजनात देखील कात्री लावून भाविकांना चुना लावायचे काम झाले आहे.


विक्रमी यात्रेसाठी विक्रमी तयारी , भक्ती सागर मध्ये ५ लाख भाविकांच्या निवासाची मोफत व्यवस्था
दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून आज नवमीला शहरात जवळपास ७ लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत . एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो . मात्र काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागे शेजारी असणाऱ्या ६५ एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे . यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले ४० एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा १०५ एकर जागेत तब्बल ५ लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे . आज दुपारी पर्यंत जवळपास ४ लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॉटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत . या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी , आरोग्य व्यवस्था , स्वच्छतागृहे , वीज , डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोया झाली आहे .