Solapur News: सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर (Solapur News) शासकीय विश्रामगृहात घटना घडली आहे. 


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली. सध्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्थानकात या कार्यकर्त्यांना नेण्यात आलं आहे. 


धनगर आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. सरकार केवळ घोषणाच देत आहे, मात्र त्यासंदर्भात कोणतीही अंमलबजावणी करत नाही, असा आरोप धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा आहे. याच मागणीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Radhakrishna Vikhe Patil Solapur : धनगर आरक्षणाची मागणी,विखे पाटलांवर उधळला भंडारा



धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, "शासनाच्या निषेधार्थ... धनगर समाजाच्या प्रश्नांकडे शासनानं कुठेतरी लक्ष द्यावं, यासाठी आम्ही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं, धनगर समाजाची घटनादत्त, एसटी आरक्षण याची अंमलबजावणी त्वरित करावी आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये, अशी आमची मागणी आहे." तसेच, धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं थेट राज्य सरकारला आव्हान करण्यात आलं आहे. येत्या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण करुन धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही मुख्यमंत्री, मंत्री यांना काळ फासयला धनगर समाज मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे.