सिंधुदुर्ग : "रिफायनरी प्रकल्पातून लोकांची दिशाभूल केली. हा प्रकल्प आणला तर आंबे येणार नाहीत असं खोटं सांगितलं. शिवाय मच्छिमारांना सांगितलं की मच्छिमारी होणार नाही. परंतु, रिफायनरीविरोधात खोटा प्रचार करून कोकणाचं नुकसान केलं, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. 


शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील आंगणेवाडी येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रिफायनरीविरोधात खोटा प्रचार करून कोकणाचं नुकसान केलं. परंतु, भराडीदेवीनं आम्हाला कौल दिल्यामुळे आम्ही सत्तेत आलो आहोत. आता हा प्रकल्प आम्ही आणू. या प्रकल्पातून कोणतील तरूणांच्या हाताला रोजगार मिळेल. शिवाय या प्रकल्पामुळे पुढील 20 वर्षांची महाराष्ट्राची अर्थव्यस्था बळकट होईल. रिफायनरीच्या विरोधामुळं कोकणानं एक लाख  रोजगार गमावला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.  


"नारायन राणे यांच्या पुढाकारातून चिपी विमानतळ झालं. या विमानतळासाठीचं श्रेय नारायण राणे यांना जातं. परंतु, काही लोकांनी याचं दोन वेळा उद्घाटन केलं. ज्यांनी या विमानतळाची एक वीट देखील रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात कोकणासाठी केलेली एक गोष्ट दाखवावी. त्यांनी फक्त थापा मारल्या. चक्रीवादळातील मदतीचे पैसे देखील दिले नाहीत. हेच यांचं कोकणावरील प्रेम आहे काय? आमच्या पाच वर्षांच्या काळात आम्ही कोकणसाठी मोठा निधी दिला. परंतु, ठाकरे सरकारने कोकणसाठी एकही योजना आणली नाही. मात्र, यापुढे आमच्या सरकारचं कोकणकडे विशेष लक्ष असणार आहे. बजेट करायला घेत आहोत. तुम्हाला काय हव आहे ते मागून घ्या असं सांगत कोकणातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालणा देणार, असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.  


नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका


गेल्या 33 वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काम कंलं. या 33 वर्षांत जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात पोहोचलो आहे. प्रथम शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपमधून काम करत आहे. आता हा शेवटचा पक्ष आहे. आता कोणत्या पक्षात जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसा देश बदलत आहेत तसेच कोकण देखील बदलत आहे. हा जिल्हा विकार करेल. परंतु, काही जण मध्ये-मध्ये येत आहेत. बाळासाहेब ठाकरे जीवंत होते तोपर्यंत कोकणी माणसाने शिवसेना वाढवली. परंतु, अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कोणकणासाठी काय केलं? कोकणात कोणताही प्रकल्प कोकणात आला की फक्त त्याला विरोध करायंचं एवढंच काम यांनी केलं, अशी टीका नारायान राणे यांनी उद्धव ठाकरे यंच्यावर केली.