Radhakrishna Vikhe Patil on Raj and Uddhav Thackeray :  NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये भव्य 'तिरंगा रॅली' पार पडली. या तिरंगा रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेने ठाकरे बंधूंच्याच झिंज्या उपटल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला. 

Continues below advertisement

ठाकरे बंधूंचे अस्तित्व संपलेलं 

मुंबईत आज ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे बंधूंचे अस्तित्व संपलेलं असून त्यांच्याच जनतेने झिंज्या उपटल्या असल्याचा जोरदार टोला विखे पाटलांनी लगावला. ते साताऱ्यातील कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

Raj Thackeray: काय म्हणाले राज ठाकरे? 

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, "जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, त्या आंदोलनाला यश आलं. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले 'जेन-झी' हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे या आंदोलनातून समजलं. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजला आहे. आम्ही या संपूर्ण यंत्रणेचे आभार मानतो," असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

Uddhav Thackeray: काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. "आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात आहे, भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. जात, पात, धर्म विसरून 'मी भारतीय' म्हणत आपण सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं की, एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे. 

मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या! तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल आणि महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी सरकार पुढे आले. मोदींना मला सांगायचंय की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून घालवताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना जीव दिलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. ही ठिणगी आता पडली आहे, देशभर वणवा पेटलाय. तरुणांनी देशाच्या सुवर्ण इतिहासातील एक पान लिहिले आहे," असे त्यांनी म्हटले.