Ratnagiri News : लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) जागावाटपा आधीच शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena-BJP) ठिणगी पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाच्या दाव्यावरून शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना, भाजपमध्ये दावे प्रतितावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवरती भाजपाने दावा केला आहे. अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 


तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचं आहे का?


या सगळ्या विषयावरून महायुतीमध्ये फूट पडेल का? असं विचारताच रामदास म्हणाले की, अजिबात फूट पडणार नाही प्रत्येकाला वाटत असतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. जमलं तर जमलं आणि असा प्रयत्न करायला कुठे अडचण नसते, तसंच तो प्रयत्न असावा, असं मला वाटतं. पण, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच असं कधी होत नसतं, अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावलं आहे.


रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची 


रत्नागिरीची जागा ही शिवसेनेची आहे. भाजपच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, याचं असं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे, ते वाटून खाऊ आणि माझ्या याला हात नको लावू. पण, असं होतं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रत्नागिरीची देखील जागा सोडणार नाही, आम्ही ती लढवणार आमचे आहे. आमच्या हक्काचं आहे. आता जे खासदार विनायक राऊत आहेत. मागच्या वेळेला त्यांच्या प्रचार करता सावंतवाडी शेवटची प्रचार सभा मी घेतली होती. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आमची हक्काची आहे, ती आम्ही का सोडू, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. 


'कुणबी समाज म्हणत भावनात्मक ब्लॅकमेल'


तुम्ही रायगडवर पण सांगाल, आम्हीच रत्नागिरीमध्ये. पण आम्हीच, असं होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचं आहे का, भाजपला हे करायचं असा त्यातून निष्कर्ष निघेल, अशा शब्दात रामदास कदम यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे रायगड लोकसभेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, केवळ निवडणुका आल्या की, कुणबी समाज म्हणत भावनात्मक ब्लॅकमेल करतात, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.


गीतेंनी कुणबी समाजासाठी काहीही केलं नाही, रामदास कदमांचा आरोप


रामदास कदम यांनी पुढे म्हटलं की, ज्या श्रीवर्धन मतदारसंघात 70 टक्के कुणबी समाज आहे. त्यावेळेला रायगड लोकसभा मतदारसंघात मागच्या वेळेला सुनील तटकरे यांना लीड मिळाला होता. याचं आत्मपरीक्षण गीते यांनी कधी केलं आहे का? कुणबी समाजासाठी या माणसाने काहीही केलेले नाही. गीते सहा वेळेला खासदार झाले दोन चार वेळेला मंत्री झाले पण कोणताही विकास केला नाही अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावले आहे.