Ratnagiri Refinery Survey: रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यातील (Rajapur Taluka) बारसूमध्ये (Barsu) वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातच काही वेळापूर्वी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि वातावरण निवळलं. 


रिफायनरी विरोधातील आंदोलनावर सध्या विरोधक ठाम आहेत. आज या माती परीक्षणाला जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे टाकल्याचा चित्र उभे राहिलं आहे. 


स्थानिकांना ठाकरे गटानं पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अर्ध्या तासापासून विनायक राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आहेत.  




खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात


बारसू इथे आंदोलकांच्या भेटीला जाणारे ठाकरे गटाचे रत्नागिरीतील  खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारसू इथे जाताना त्यांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतलं. राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर राजन साळवी त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न : उदय सामंत


हा तणाव का निर्माण झालाय, याच्या खोलाशी जाणं गरजेचं आहे. विद्यमान खासदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहे. स्वत: पत्र देऊन एक्स्पोज झाल्याने काही करुन या प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. लोकांची डोकी भडकावण्याचं काम सुरु आहे. बाहेरचे लोक आंदोलनात सहभागी झाली आहेत. आंदोलकांचं काहीही म्हणणं असलं तरी सरकार चर्चेसाठी तयार आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं.


प्रशासनसोबतच्या बैठकीत काय झालं?


रिफायनरीला झालेल्या विरोधानंतर रिफायनरी विरोधक, समर्थक, प्रशासन आणि तज्ज्ञ मंडळी यांच्यात गुरुवारी (27 एप्रिल) जवळपास दोन तासापेक्षा देखील जास्त वेळ चर्चा झाली. राजापुरातील प्रांताधिकारी कार्यालयात एवढे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विकास, रोजगार, पर्यावरण, मासेमारी तसेच तांत्रिक मुद्द्यांसह अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली. काही वेळेला चर्चेदरम्यान किरकोळ वादाच्या घटना देखील घडल्या. पण पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील सर्व गोष्टी टाळल्या. यावेळी दोन्ही बाजूने उपस्थित केल्या गेल्या प्रश्नांना तज्ञांनी देखील उत्तरं दिली. दरम्यान, चर्चेअंती दोन्ही बाजूचा विचार करता संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या. या चर्चेनंतर नेमकं फलित काय असा सवाल देखील काहींनी विचारला? मुख्य बाब म्हणजे यावेळी राजापूर तालुक्यातील केवळ बारसूच नव्हे तर यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील 8500 एकर जमीन देखील रिफायनरीसाठी घ्यावी. जेणेकरुन जास्त क्षमतेची रिफायनरी कोकणात उभी राहील अशी मागणी देखील समर्थकांकडून करण्यात आली. चर्चाअंती जिल्हाधिकारी यांनी ' रिफायनरी झाली पाहिजे. पण असं असताना सर्वांशी सुसंवाद ठेवला जाईल. प्रत्येकाच्या संख्येचा निरसन केल्या जाईल, असं आश्वासन देखील दिलं.