आठवले म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. याला शिवसेनेने देखील विरोध केला आहे. ते नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं भाजपने मी दिलेला तीन- दोन वर्षांचा फॉर्म्युला मान्य करावा. जर त्यांनी तो मान्य केला असता तर राज्यात आत्ता आमचं सरकार असतं. सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हाला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की, मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले.
शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मलूल भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असेही आठवले म्हणाले.