Raigad Accident: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मौजे कासारमलाई येथे रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. रिक्षा दुभाजकाला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे कणघर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेरी येथे झालेल्या कुणबी समाजाच्या सभेत सहभागी होऊन संतोष नाना सावंत (वय 38) आपल्या रिक्षामध्ये सात जणांना घेऊन परतत होते. मात्र कासारमलाई फाट्याजवळ रस्त्याचा तीव्र उतार आणि रिक्षाचा वेग यामुळे संतोष सावंत यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी रिक्षा थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. धडकेचा जोर एवढा होता की, संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संदेरी गावात कुणबी समाजाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी म्हसळ्यातील कणघर येथील सात ते आठ ग्रामस्थ रिक्षामधून गेले होते. दुपारी सभा संपवून परतताना दुपारी सुमारे अडीच वाजता मौजे कासारमलाई गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघातात शांताराम पांडुरंग धोकटे (वय 74) आणि शामा तुकाराम धोकटे (वय 55) या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संजना संतोष मगर (वय 37), प्रभाकर पांडुरंग धाडवे (वय 73), संतोष रामचंद्र मगर (वय 38) आणि पांडुरंग रामचंद्र धोकटे (वय 50) हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले. म्हसळा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. संपूर्ण कणघर परिसरातील ग्रामस्थ हे एकाच गावातील असल्यामुळे या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी तीन व्यक्तींना गमावल्याने गावात शोकाकुल वातावरण आहे. मृत्यू पावलेले तिघेही गावातील ज्येष्ठ आणि परिचित व्यक्ती असल्याने त्यांच्या निधनाची तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांची चौकशी सुरू
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी होऊन काही प्रवासी खाली फेकले गेले तर काही रिक्षाखाली दबले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. पोलिसांना कळताच म्हसळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. मात्र प्राथमिक अंदाजानुसार रिक्षा भरधाव वेगात होती आणि नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.