पुणतांबा (अहमदनगर) : शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांब्यातून आता नवीन क्रांतीची तयारी सुरु झाली आहे. सरकारला काही द्यायचं नाही आणि सरकारकडे काही मागायचं नाही. हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करता गावरान वाणाची पेरणी करायची. उत्पादन कमी करुन उत्पन्न वाढवायचे अशा प्रकारची भूमीका घेऊन राज्यातील शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार आहे.


बलिप्रतिपदा या बळीराजाच्या सणाला म्हणजेच 20 ऑक्टोबरला पूणतांब्यात शेतकरी जनजागृती मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार असून गावरान वाण लावून आपला हमीभाव आपणच ठरवा अशा प्रकारची नवी भूमीका मांडण्यात घेऊन एक नवे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.

सरकारकडून मदत मिळत नाही तर शेतकऱ्यानेही आता सरकारला मदत करायची नाही. सरकारला विकास करायचा असेल तर शेतकऱ्याची जमीन लागते. मात्र याच शेकतऱ्याला आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नाही. त्यामुळेच आता अशा प्रकारची ही नवी भूमीका घेऊन येत्या 20 तारखेला किसान क्रांतीच्या वतीने पुणतांब्यात जनजागृती मेळावा घेऊन करणार सुरवात होणार आहे.

आता राज्यातील शेतकरी या नव्या भूमिकेला किती पांठिबा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.