पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वीचा ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. पुण्यातील मावळमधील टाकवे गावातही ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. मात्र निवडणुकीनंतर हे गाव अचानक चर्चेत आलं आहे. कारण टाकवे गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे.


सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाकवे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून लिंबाला खिळे ठोकण्यात आली आहेत. आणि ते खिळे मारलेले तीन लिंबू इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडाला ठोकण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून त्यात खिळे मारून लिंबू झाडाला ठोकून भीती पसरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.



सांगलीतील कवठेपिरान गावात कमाल, पत्नी सरपंच तर पती उपसरपंच पदावर बिनविरोध!


घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल अविनाश असवले यांनी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सरपंच, उपसरपंच निवडप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हे कृत्य करण्यात आलं असावं. जादूटोण्याचा प्रकार करुन भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि समजात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी, अविनाश असवले यांनी केली आहे.


अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारे समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.