पुणे : भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांचं योगदान काय? असा सवाल काकडे यांनी विचारलाय. तसंच पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं काकडेंनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय.


भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्यसभेची जागा लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केलीय. मी सहयोगी म्हणून नाही तर भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं. महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यात मीळालेले यश पाहता पक्ष माझा विचार करेल, असंही त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडेंना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेऊ नका : संजय काकडे

उदयनराजेंचं योगदान काय?
मला माध्यमातून असं कळतंय की उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नक्की झालीय. पण उदयनराजे यांचं योगदान काय? असा थेट सवाल संजय काकडे यांनी केला. उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आले नाही. हरलेल्या व्यक्तीला मंत्रीपद कसं मिळेल, असा प्रश्न काकडेंनी उपस्थित केला. उदयनराजे भोसले आहेत म्हणून उमेदवार होउ शकत नाही. तसा निकष लावला तर आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. काकडे हे शिवाजी महाराजांचे सरदार होते, अशीही माहिती काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पण उदयनराजेंना 80 वर्षांच्या व्यक्तीने पाडलं जे दहा वर्षं राजकारणात नव्हते. असं सांगत माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मोदी आणि शाह. मी त्यांना म्हटलं, की तुम्हीच माझ्या वतीनं मोद शाहांना भेटा. मला फडणवीस डावलतील असं वाटतं नाही, डावलल्यावर बघू, असंही काकडे यावेळी म्हणाले.

कुणाकडे किती पाठबळ?
येत्या दोन एप्रिलला राज्यसभेतील काही जागा रिकाम्या होत आहे. पैकी महाराष्ट्रातील सात जागा रिकाम्या होणार आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या 2, भाजप 2, तर काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी 1 अशा जागांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, माजिद मेमन, अमर साबळे, हुसेन दलवाई, राजकुमार धूत आणि संजय काकडे या खासदारांचा कार्यकाळ संपतोय. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, चौथी जागा हाती लागावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेनं सर्वानुमते एक उमेदवार द्यावा अशी भूमिका घेतलीय.

Rajya Sabha election | राज्यसभेच्या सात जागांवर राज्यातून कुणाची वर्णी लागणार? | ABP Majha