Pune Rain Update: पुण्यासह राज्यातील इतर भागांमध्ये पुन्हा पावसाचा (Pune Rain) जोर वाढल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी  लावली आहे. तर हवामान विभागाकडून पुण्यासह घाटमाथा परिसराला पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज (Pune Rain) वर्तवण्यात आला आहे. तर, इतर भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.


हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे (Satara And Pune) घाटमाथ्यासाठी आज (शनिवारी) अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. एक ऑगस्टपासून राज्यामध्ये मान्सून वेगाने सक्रिय झाला आहे. पश्चिम बंगाल व झारखंडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता पुढील २४ तासांत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला आहे. कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. दरम्यान, आज आणि उद्या (शनिवारी, रविवारी) राज्यभर मुसळधार अंदाज आहे.


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून  मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवला


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून  मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून पहाटे 5 वाजता 21 हजार 142 क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग  कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग पुणे यांनी दिली आहे. 


राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा (Satara And Pune) या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.