पुणे :  राज्यातील बहुतांश भागात  आठवडाभरापासून मुसळधार पाऊस  (Rain) पडत आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.  मुसळधार पावसाने रायगड-पुणे (Raigad- Pune)  जिल्ह्याला जोडणारा  ताम्हिणी घाट (Tamhini Ghat)  खचला आहे. ताम्हिणी घाट खचल्याने  दुरुस्तीसाठी   5 ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. 


 पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात रस्ता एका बाजूने खचला आहे. या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदचे निर्देश दिले आहेत. 


5  ऑगस्टपर्यंत ताम्हिणी घाट बंद


 मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचलेला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता 5  ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील  रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. तसेच सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येते. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून  वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून ताम्हिणी घाट बंद करण्यात आला आहे. 


पुण्यातून कोकणात जाणारे दोन्ही घाट बंद 


पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेकवेळा अचानक दरडी कोसळत असतात. झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटनाही घडतात.  पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. वरंधा घाट आणि ताम्हिणी घाटाने कोकण गाठता येते. वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अनेक वळणे आहेत. त्याऐवजी ताम्हिनी घाट सुरक्षित आहे. यामुळे हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना वरंधा घाट बंद केला आहे. 30  सप्टेंबरपर्यंत हा रस्ता बंद आहे.  त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्यांसाठी दोन्ही रस्ते बंद आहेत.  


हे ही वाचा :


सावधान! राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हमानाचा अंदाज