पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीनं डोकं वर काढलं आहे. इथल्या खराळवाडीत 12 ते 13 जणांच्या टोळक्यानं तब्बल 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.


पिंपरीतल्या रस्त्यावर जाताना खराळवाडी इथल्या व्यक्तीचा या टोळक्यातल्या एकाला धक्का लागला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. याच क्षुल्लक कारणावरुन या परिसरातली सगळी वाहनं जाळल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी सध्या या टोळक्यातल्या काही जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातल्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यांपासून सातत्याने वाहन तोडफोड आणि जळीतकांडामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी धायरी भागात एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडा सिटी या आलिशान गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना समोर आली होती.

तर जानेवारी महिन्यात पिंपरीच्या रामनगर येथील दहा ते बारा वाहनांसह अनेक घरांना ही समाजकंटकांनी लक्ष्य केलं. यात अनेक आलिशान गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. त्यामुळे येथील टोळक्यांच्या हुल्लडबाजीमुळे पुणेकर त्रस्त आहेत. त्यांना लगाम घालण्यात स्थानिक पोलिसांना अपयश येत आहे.