Pune Rain Accident News: बोपोडीमध्ये मुळा नदीच्या पुराच्या पाण्यातून कारमध्ये अडकेलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना आणि त्यांच्या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.  ही घटना काल रात्री घडली आहे. काल दिवसभर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरमध्ये तसेच मावळ आणि मुळशी तालुक्यात पडणारया मुसळधार पावसामुळे मुळा नदी ओसंडून वाहत आहे.  त्यामुळे पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील हॅरीस पुलाखालील बोगद्यात पावसाचे पाणी तसेच शेजारील मुळा नदीचे पुराचे पाणी साचले होते. 


या बोगद्यातून पुणे मुंबई महामार्गावरून येणारी वाहने भाऊ पाटील रोडवरून औंध, रेंज हिल्स, पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर व इतर ठिकाणी जातात. काल 13 जुलैला रात्री 7.30 वा च्या सुमारास टाटा सफारी कार या बोगद्याजवळ पाण्यात अडकली होती. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने कार तेथे अडकली असावी अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
या कारमध्ये लष्करी अधिकारी, त्यांची पत्नी व दोन मुले असे एकाच परिवारातील 4 जण अडकले होते. त्यांच्या सोबत त्यांचा पाळीव कुत्रा देखील होता. संतातधार पाऊस असल्याने पुराच्या पाण्याची पातळी वाढून पूर्ण कार बुडण्याची भिती होती. त्यामुळे प्रसंगावधान दाखवत अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे गाडीने प्रवास करत असताना पाण्याचा अंदाज घेऊन प्रवास करा,असं वारंवार आवाहन नागरिकांना केलं जात आहे.


अनेक ठिकाणी असे अपघात झाले


सध्या सगळ्या महाराष्ट्रात मुसळधार पावासामुळे अनेक नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यात पालघर, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या शहरात अनेक अपघाताच्या घटना देखील बघायला मिळाल्या. पुण्यातील पानशेत जवळील इंद्रायणी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने सुमारे 8 गावांता संपर्क तुटला आहे. पिंपरी-चिंचवड, पुण्यात देखील या अतिवृष्टीमुळे पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कसलीची हिंमत करु नये आणि सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना केलं जात आहे.