पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना देखील मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याबद्दल तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 


शशांक पुरुषोत्तम परांजपे आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे अशी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या परांजपे बंधूंची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात पोलिसांकडे तक्रार आलेली.  याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि विश्वास घात केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. 


वसुंधरा डोंगरे यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम 476, 467, 68, 406, 420 आणि 120 ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार या वारस असतानाही त्यांच्या कोणतीही माहिती न देता जमिनीची विक्री करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर वसुंधरा डोंगरे यांनी रितसर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर परांजपे बंधुना रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.